कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.जुलै महिन्यात कल्याण शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण पश्चिम मधील मांडा-टिटवाळा,अटाळी,वडवली,घोलपनगर,भवानी चौक,गोविंदवाडी,रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पूरुपरिस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. घरातील सामान खास करून अन्नधान्याचे नुकसान झाल्याने गोरगरीब जनतेसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने या अडचणीच्या समयी पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यात यावा या उद्देशाने त्यांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कल्याण पश्चिम चे आमदार तथा शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला त्यांच्या उपस्थितीत आज मांडा-टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करून सुरुवात करण्यात आली. मांडा-टिटवाळा येथील सुमारे 250 जणांना,घोलपनगर,भवानी चौक येथील 450 जणांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने तर अटाळी-वडवली येथील 450 पूरग्रस्तांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले.तर रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील सुमारे 250 पूरग्रस्तांनाही शहर शाखेच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याचे पंचनामे सुरू आहेत.अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असून काही थोडेच बाकी राहिले आहेत त्यामुळे शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष आल्याने आमचे ही काही कर्तव्य आहे याचं भावनेने थेट पूरग्रस्तांना मदत मिळावी याच हेतूने ही मदत नव्हे तर कर्तव्य केल्याची भावना यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली.