पुणे : कोरोनाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यातील चर्चेनंतर निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, निर्बंधाचा निर्णय असा लगेच घेतला जात नाही. त्यावर चर्चा होईल. मंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील. आरोग्यमंत्री माहिती देतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा होईल. मगच काय तो निर्णय घेतला जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये याचबरोबर काळजी घेणेही गरजेचे आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला, आता काय करायचे ते राज्य सरकार ठरवेल.
लसीकरण व्यवस्थित सुरू आहे. काही ठिकाणी ते कमी पडले असे समजते आहे. त्याची चौकशी करून तिथे पुरवठा केला जात आहे. सर्वांचे लसीकरण व्हावे यादृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. याचा आढावा संबधित खाते, मंत्री यांच्याकडून वारंवार घेतला जात आहेअसेही ते यावेळी म्हणाले.