ठाणे : शहरातील नवीन ४९ कोरोना रुग्णांची भर आज ठाण्यात पडली असून ५१जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
महापालिका हद्दीतील आठ प्रभाग समिती क्षेत्रात एक आकडी रूग्णसंख्या सापडली आहे. सर्वात जास्त १७ रूग्ण माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये मिळाले आहेत. नऊ जण वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये वाढले आहेत. प्रत्येकी पाच रुग्णांची भर दिवा, कळवा आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती भागात पडली आहे. लोकमान्य-सावरकरनगर, वागळे आणि उथळसर या प्रभाग समिती परिसरात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे तर शून्य रूग्ण मुंब्रा प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत. दोन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ५१जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ३४ हजार १४६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात ४८६ जणांवर उपचार सुरू आहेत तर एक रूग्ण दगावला आहे. आत्तापर्यंत दोन हजार ७५ रूग्ण मृत्यू पावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील तीन हजार १४० नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४९जण बाधित सापडले. आत्तापर्यंत १८ लाख ७९ हजार ३३ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ३६ हजार ७०७जण बाधित सापडले आहेत.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.