ठाणे : ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले जात आहे. `देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची उठबस’ अशी स्थिती सध्या शहरात दिसत आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला.
महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहांतर्गत लसीकरण शिबिर घेण्यात येणार होते. त्यास महापालिकेने नकार दिला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाच्या पक्षपाती निर्णयाबद्दल टीका केली. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांची उपस्थिती होती.
भाजपा खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा गंभीर आरोप
प्रत्येक नागरिकाला लस मिळाली पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. गेल्या एक-दीड महिन्यांपासून ठाण्यात राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाव दिला जात आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिल्कूल नाही. ती केंद्र सरकारची आहे.
मात्र, ठाण्यात राजकीय पक्षबाजीसाठी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांना लसीकरणाची शिबिरे दिली जातात. एखाद्या आपत्तीत नागरीकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षबाजीमुळे सामान्य नागरीक लसीपासून वंचित ठेवणे, हेही पाप आहे. हाच प्रकार महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे. महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये. अन्यथा, गंभीर परिणाम होतील, असा इशाराही खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिला.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.