मुंबई : ‘एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,’ या आणि अन्य मागण्यांसाठी संघटनांनी आझाद मैदानातून २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली. या मागण्या पूर्ण होण्यापूर्वी संघटनांनी माघार घेतल्याने कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अघोषित संप सुरू केला. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून, महिनाभरानंतरही एसटी संप सुरूच आहे.
एसटी कर्मचारी कामावर रूजू होत असल्याचा दावा महामंडळ करीत असले, तरी सध्या २०० आगारांतील सेवा ठप्प आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी असंवेदनशीलपणे एसटी कामगारांचे आंदोलन हाताळले आहे.

एसटी कामगारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेऊन मार्ग काढावा, असं सांगत संघर्ष एसटी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आज, सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आतापर्यंत ४० पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. कर्मचारी मानसिकतेचा विचार न करता शिस्तभंगाच्या कारवाया आणि धमकीचे सत्र चालवून अतिशय असंवेदनशील पद्धतीने हे आंदोलन हाताळले.
महाराष्ट्राचे पालक म्हणून कर्मचारी स्थिती लक्षात घेता मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी शशांक राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.