मुंबई : अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीविरोधात समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली एनसीबीकडून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान, एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, काल एका सभेत बोलताना नवाब मलिक यांनी एका वर्षांत समीर वानखेडेंची नोकरी घालवणार. त्यांची तुरुंगात रवानगी करणार, असे विधान केले होते. त्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडून समीर वानखेडेंची चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.