मुंबई : राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. यावर शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एसटी कामगाराचे शासनात विलिनीतरण शक्य नाही, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासूनच सांगत होतो. मान्यता प्राप्त युनियन पवारांच्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही, असे माहीत होते, तरीदेखील राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात का उल्लेख केला ? असा सवाल त्यांनी केला आहे.
पडळकर पुढे म्हणाले की, गेली 50 वर्ष हे कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत. ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले, त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला. आम्ही आंदोलन करता होतो तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचार्यांना भडकवत आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.