डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली मधील अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळण झालीये. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली पुलाच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेत त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते तसेच या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो . पावसाने आठवडाभराची उघडीप देऊन देखील प्रशासनाकडून या पुलावरील खड्डे बुजवण्यात न आल्याने आज भाजपा महिला आघाडी तर्फे महिला कार्यकर्त्यांनी मातीचा भराव टाकून खड्डे बुजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला.या आंदोलनात 75 वर्षांच्या आजी देखील सहभागी झाल्या होत्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव जाईल का अशी भीती व्यक्त केली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणारा एकमेव ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मंगळवारी खड्डेमय उड्डाणपूलाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाच्या रस्त्यावर खड्डेभरो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
या वेळी प्रशासनाने रस्ते दुरुस्तीच्या कामांना लवकर सुरुवात केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील,माजी नगरसेविका खुशबू चौधरी, अमृता जोशी, मनीषा छल्लारे, वर्षा परमार, हेमलता संत, चित्रा माने, सायली सावंत, धरती गडा, वंदना आठवले आदी महिला आंदोलनात सहभागी झाले होत्या.या आंदोलनात भाजपा महिलांनी रस्तावर पडलेल्या खड्ड्यात माती-विटांची भरणी करून ते खड्डे बुजविले.महिलांनी स्वतः भरलेली मातीची घमेली-फावडे घेऊन खड्डे भरले. सामान्य नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये ही भूमिका या आंदोलनामागे होती.यावेळी पुनम पाटील म्हणाल्या, शहरभर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.पालिका प्रशासन झोपी गेले असून त्यांना रस्त्यांकडे बघायला वेळ नाही.रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता त्याचे पुढे काय झाले. रस्त्यांची दुरवस्था का होते याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत.रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होत आहे. आयुक्तांनी याची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करावे. फक्त सणवार आले की रस्त्यांची डागडुजी करून रस्त्याला मलमपट्टी लावू नये टीका केली.तर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या वंदना आठवले म्हणल्या, या खड्ड्यांमध्ये पडून वाहनचालक जखमी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे यावेळी सांगितले.
Credits and Copyrights – Stream7news.com