पुणे : खडकवासला धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण 91 टक्के म्हणजे 26.47 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरण क्षेत्रात रविवारी दिवसभरात अवघा 1 मिमी पाऊस झाला, तर पानशेत-12, वरसगाव-10 आणि टेमघरमध्ये 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण यापूर्वीच 100 टक्के भरल्याने विसर्ग सुरू होता. शनिवारपासून धरणातून नदीमध्ये 856 क्युसेकने विसर्ग सुरू होता. आता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. धरणातून आतापर्यंत 3.85 टीएमसी इतका विसर्ग करण्यात आला आहे. सध्या पानशेत धरण 98 टक्के भरले असून धरणात 10.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर वरसगावमध्ये 11.27 टीएमसी म्हणजे 88 टक्के आणि टेमघरमध्ये 2.88 टीएमसी म्हणजे 78 टक्के पाणीसाठा आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com