मुंबई : ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना अचानकपणे काढून टाकल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.
विशेष म्हणजे किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना या मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन नव्या वादाला तोंड फुटलं होतं. याप्रकरणी त्यांनी शरद पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची भेट घेतली होती. ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. यामध्येच आज ( ४ फेब्रुवारी) किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अनेक गौप्यस्फोटही केले आहेत.
“पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा एकच आहे.मला मालिकेतून काढून टाकण्यापूर्वी कोणतंही कारण, तक्रारी याविषयी कोणताही मेल का आला नाही? किंवा, चॅनेललाही तशी नोटीस किंवा मेल का पाठवला नाही? माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हिंदीमधील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एका मराठी अभिनेत्याला हुकूमशहासारखा आदेश येतो. बेकायदेशीरपणे त्याला काढून टाकलं जातं हे गंभीर आहे, असंविधानिक आहे आणि अन्यायकारक आहे. हे पूर्वापार चालत असेल तर फार भयानक आहे. निदान आता तरी माझ्यानिमित्ताने हे बदलायला हवं. ही माझी इच्छा आहे”, असं किरण माने म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “सुरुवातीच्या काळात मला काढून टाकण्यामागे व्यावसायिक कारण असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अत्यंत धक्कादायत आणि नवीन कारण दिलं ते म्हणजे महिलांशी गैरवर्तन. आता महिलांशी गैरवर्तन हे गंभीर स्टेटमेंट आहे.माझ्यावर करण्यात आलेले आरोप धाधांत खोटे, बदनामीकारक आहेत. मला ठरवून, कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.”
5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा (Kiran Mane)
‘किरण माने यांच्याबाबत जे झालं हे नवीन नाही. आत्तापर्यंत हे होत आलं आहे. महिलांना पुढे करुन अनेक कलाकारांना काढण्यात आलं आहे, अशी आधी देखील प्रकरणे घडली आहेत. किरण माने यांच्या प्रकरणामुळे एक बाब आहे की, प्रोडक्शन हाऊसकडून कोणत्याही प्रकरचे कायद्याचे प्रमाण वाढत आहे. किरण माने यांच्या प्रकरणात महिलांच्या तक्रारी आहेत, असं सांगून करवाई झाली आहे. या प्रकरणामध्ये चॅनलने किरण माने यांच्यावर करवाई करणं गरजेचं होतं, हे का केलं नाही. या प्रकरणी चॅनलने संबंधित तरुणीची तक्रार घेणं गरजेचं होतं आणि तत्काळ किरण माने यांना नोटीस द्यायला होती. यापैकी कोणतीही बाब पाळली गेली नाही. त्यांनी जाणीपूर्वक या बाबी केल्या आहेत आणि अतिशय वाईट पद्धतीन किरण माने यांना काढण्यात आलं आहे. त्यांची बदनामी केली. म्हणून पॅनोरमा प्रोडक्शन यांना 5 कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे. शिवाय त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्याना सन्मानाने परत घ्यावं अणि लेखी माफीनामा मागावा अन्यथा आम्ही कोर्टात जाणार आहोत’, असे वकील असिम सरोदे म्हणाले.
हिंदी-मराठी वाद?
यावेळी त्यांनी जातीवादावर देखील भाष्य केले. एक हिंदी प्रोडक्शन मराठी कलाकाराला कामावरून काढून टाकते आणि त्याची बदनामी करते, अशावेळी मराठी कलाकारांनी पुढे येऊन साथ द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. तर, स्टार नेटवर्कने पॅनोरमा प्रोडक्शनवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी कायदेशीर नोटीसीत केली आहे.