सिंधुदुर्ग : जंगलातील रानभाज्या नैसर्गिकरित्या तयार होत असल्याने त्याच्यावर कुठलाही प्रकारचा केमिकल्स शिडकावा असत नाही. त्याची जंगलातच वाढत असल्यामुळे अशा पद्धतीच्या भाज्यांमध्ये निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती ही निसर्गतः असते. त्यामुळे जंगलात मिळणारी ही खरी संपत्ती आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन भरवणे हा खरच खूप स्तुत्य उपक्रम आहे. परंतु त्यापुढे जाऊनही त्याला बाजारपेठ कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणे देखील आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड(उमेद) यांचे संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी देवगड पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, आत्मा समितीचे अध्यक्ष महेश पाटोळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका कृषी अधिकारी उलपे, रानभाजी तज्ञ संदीप राणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले की, रानभाज्या लोकांसमोर यावेत हा हेतू स्वच्छ आणि लोकांच्या हिताचा आहे. २०२०-२१ या कोरोना महामारी च्या वर्षात कधी नव्हे ते आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलोय. रानभाज्यांची मागणी मुंबई व अन्य ठिकाणी वाढू लागली आहे असाच महोत्सव जर मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये केला असता तर त्याचा खूप चांगला फायदा इथल्या लोकांना निश्चितच झाला असता.व्यवसायिक दृष्टीने या गोष्टीकडे पाहणे फार गरजेचे आहे असेही राणे म्हणाले. जंगल हीच शेतीची माता आहे जीवनसत्व व क्षार यांचा मोठा स्त्रोत म्हणजेच या हिरव्या रानभाज्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची प्रदर्शने ही सातत्याने भरवली गेली पाहिजेत असे मत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी व्यक्त केले आहे. तर सभापती रवी पाळेकर म्हणाले, आपल्या आजूबाजूलाच 60 ते 70 प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात होत असतात.मात्र यातील ठराविक भाज्यांची माहिती लोकांना असते आपल्याकडे पिकलेल्या या रानभाज्या आपल्याच लोकांना माहीत नसतात त्या माहित व्हाव्यात या हेतूने हे प्रदर्शन कित्येक वर्षांनी प्रथमच भरवण्यात आले असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा आपापले मत व्यक्त करत रानभाज्यांचे महत्व पटवून दिले. यावेळी आत्मा कमिटीचे अध्यक्ष महेश पाटोळे म्हणाले या प्रदर्शनात 40 प्रकारच्या भाज्या आहेत यापुढेही आंबा व काजू महोत्सवाचे अशा प्रकारे आयोजन करून स्थानिक बचत गटांना या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या आत्मा कमिटीच्या वतीने केले जाईल. रानभाजी महोत्सवात रानभाजी सोबत पाककृती देखील उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. यामध्ये बचत गटाने तयार केलेल्या टाकळ्याची बर्फीची चव देखील आमदार नितेश राणे यांनी चाखून पाहिली. ग्राम संघाच्या माध्यमातून या रानभाजी महोत्सवात कातवणेश्वर, मिठमुंबरी, वाडा, कुवळे, कट्टा, आरे, पुरळ, पडवणे, मुणगे, शिरगाव साळशी, सांडवे, कुणकेश्वर, कातवण, रहाटेश्वर आदी गावातील ग्रामसंघाने सहभाग घेतला होता. यावेळी देवगड तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बचत गटातील महिलाही या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com