महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमामध्ये मांडले होते. त्यानंतर राज्यामध्ये गदारोळ माजला. त्यावर बऱ्याच चर्चादेखील घडल्या आहेत. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर मात्र आता राज ठाकरेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे.
यावर राज ठाकरे काय म्हणाले ?
राज ठाकरे यांना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा व प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले व यशवंतराव चव्हाणसुद्धा वाचले. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारामधून बाहेर येणे गरजेचे आहे, हा वक्तव्यमागचा अर्थ होता, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पवारांच्या भेटीला जातो, तेव्हा मराठा म्हणून जात नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. जातीचे वातावरण तयार करण्यात येत आहे, असेदेखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावणारे चित्र
महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. जातीवरती मतदानसुद्धा व्हायचे व ते आजही होते. मला सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये असे दिसते की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहे, परंतु दुसऱ्याच्या जातीबाबतचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला डाग लावणारे चित्र आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणे, हे कधी महाराष्ट्रात नव्हते. हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून चालू झाले. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग बनला आहे. महाराष्ट्रामध्ये जातीचा मुद्दा हा सर्वांथामुळे मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसले पुस्तक लिहिले? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे व कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणामध्ये मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले, मग माळी समाज मग इतर समाज हे सर्व रचलेले आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.
नेमकं प्रकरण काय होत ?
राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला व सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळा संघर्ष उभा करण्याचा एक प्रयत्न करत असताना दिसत आहे. राज ठाकरे यांचे जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेसुद्धा आकलन नाही, अशी थेट टीकाच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे, मात्र हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा तसेच आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस असल्याचादेखील विसर पडला आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी व पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारसरणीशी एकदम जवळीक साधणारी आहे हे नक्की, असेही प्रवीण गायकवाड म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.