मनसे आमदार राजू पाटील यांनी आज रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी पत्र देत रेल्वे प्रवाशांकरिता काही मागण्या केल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी दिवापासून पनवेलपर्यंत रेल्वे लोकल सेवा चालू करावी, अशी मागणी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि रायगडमधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकरिता सर्वंकष आराखडा तयार करावा, अशी मागणी आता मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
दिवापासून पनवेलपर्यंत लोकल सेवा सुरू व्हावी, अशी नागरिकांमार्फत सतत मागणी होत आहे. दिवा ते पनवेल या रेल्वे स्थानकांमध्ये दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल असे रेल्वे स्टेशन्स येत असून, हे भाग मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येत असल्यामुळे नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहा या रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे शटल सेवा चालू असून, दररोज ठराविक वेळेमध्ये या गाड्या सुटत असतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे या भागांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दातिवली, निळजे, तळोजा पंचानंदसोबत अगदी कळंबोलीपर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प झाले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामेही चालू असून, दिवसेंदिवस या भागांत लोकसंख्या वाढत आहे.
या स्टेशनवर जाण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही
निळजे, तळोजा या भागांत नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्टेशनवर जाण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय येथील नागरिकांना उपलब्ध नाही. सदर स्टेशन गाठण्याकरिता प्रवाशांना कमीत कमी ७ ते ८ किमी प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, पैसा वाया जातोच, शिवाय प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोयही होते. त्यातच परिवहन सेवादेखील अपुरी असून, या परिसरामधून मुंबई-ठाणे परिसरात नोकरी, व्यवसायाकरिता येणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होतात.
लोकल सेवा सुरू करणे हाच चांगला पर्याय
सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम चालू झाले आहे. त्या ठिकाणचा बराचसा भाग या परिसराला जोडला गेला असून, या परिसरामधून केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मल्टीमॉडेल कॉरिडॉर जाणार असून, त्याचेही काम सुरू आहे. अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून लोकल सेवा सुरू करणे हाच चांगला पर्याय आहे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि रायगडमधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकरिता सर्वंकष आराखडा तयार करावा, अशीही मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे दिल्लीमध्ये जाऊन केली आहे.
Credits and. Copyrights – May Marathi