मुंबई : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून गोवा ते मुंबी मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी गुन्हा केला तर कारवाई होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याविषयी अधिक माहिती नाही. ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणे बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत, ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दुसरीकडे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी यासंदर्भात भाष्य केले असून, नितेश राणेंनी काय केले आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.