स्रोत: रत्नागिरी खबरदार
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. आज यावर हायकोर्टात सुनावणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत.
मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज हायकोर्टाच्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळं उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तूर्तास एस.टी. कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कनिष्ट वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आहेत.
संपाविरोधात एस.टी. महामंडळानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज राज्यातील 250 डेपोंपैकी 59 डेपोंचं कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निर्देशांनंतरही कामबंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये?, अशी विचारणा करत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.