मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले असून, महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार ताशेरे ओढण्यात आले. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील.
मला हे कळत नाही की सरकार इतके असंवेदनशील कसे आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असते तर महिलांना न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवे, या शब्दांत महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली आहे. पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.
ही दुर्देवी घटना आहे. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही. आरोपींच्या मनात भीती असती, तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदा-सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असा आरोप राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी यावेळी केला.