ठाणे : RTE या योजनेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित केले असतानाही बेकायदेशीरपणे वय वाढवून प्रवेश दिल्याचा घोटाळा जागृत पालकांनी उघडकीस आणला आहे. या भ्रष्टाचारामुळे हजारो पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
वंचित आणि दुर्बल घटकातील मुलामुलींना खासगी शाळेत प्रवेश मिळावा याकरिता २५ टक्के आरटीइ या योजनेतून प्रवेश दिला जातो. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या वयाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी १ ऑक्टोबर २०१४ ते जास्तीत जास्त ३१ डिसेंबर २०१५ ही वयोमर्यादा निश्चित केली असतानाही या वर्षी प्रवेश देताना तीन महिन्यांचा कालावधी वाढविण्यात आला, त्यामुळे ज्या पालकांनी निश्चित करण्यात आलेल्या वयानुसार प्रवेश अर्ज भरले होते, त्यांना डावलून ज्यांचे वय जास्त आहे, अशा मुलांना आरटीइ योजनेंतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा महापालिकेच्या शिक्षण विभागाने पडताळणी करणे आवश्यक होते, परंतु त्यांनीही पडताळणी केली नाही त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
शिक्षण अधिकार अंतर्गत घोटाळा?
शिक्षण विभागाने वय वाढवल्याचा कोणताही अध्यादेश काढलेला नाही, त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकमान्यनगर येथे राहणारे विकास राऊत यांनी केले आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आयुक्त डॉ. विपीन शर्मा, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
श्री. राऊत म्हणाले की या घोटाळ्याबाबत शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांचशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वय वाढविल्याचा अध्यादेश आला नाही, परंतु शिक्षण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर मात्र १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ अशी कालमर्यादा दिसते. त्यामुळे त्या वयातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. त्याबाबतचा अध्यादेश मात्र नाही, असे त्यांनी उत्तर दिल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तक्रारीची दखल घेऊन ती पुणे येथील शिक्षण विभागाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
या योजनेत वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराला खीळ बसली असून या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पालक करत आहेत.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.