मुंबई : बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसच्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारीदेखील कोरोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
बेस्ट आणि लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. आपलं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे. इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल आहे. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण आल्याने कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा होणार आहे आणि प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट पाहिजे. बेस्टची एक तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वे आणि मेट्रोमध्ये एकच तिकीट चालू शकेल. लोकलबाबत विचारणा होत आहे, चावी आपल्याकडे आहे, ती किती फिरवायची हे आपल्या हातात आहे. लोकल सुरू करायचा आहेत. हॉटेल सुरू करायच्या आहेत, यांची चावी आपल्या हातात आहे. अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे मालक भेटून गेले व त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली आहे. लोकलच्या प्रवासासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. आपण हे सर्व काही करणार आहोत फक्त पुरेशी काळजी घेऊ, कोरोना उलटणार तर नाही ना हेही आपणास पहावे लागणार आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते केल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Credits and Copyrights – ratnagirikhabardar.com