राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील विधानाचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी वाचन वाढवण्याचा सल्ला देत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहिती नसावे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहिती नसावे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.