स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं योग्य नाही, असे म्हणत संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. ऐन दिवाळीत राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मुद्यावर संप पुकारला आहे.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्यांना पै-पाहुण्यांकडे जाणेही अडचणीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने कामगार संघटनांना याआधीही संप मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत तरीही कर्मचारी आणि त्यांच्या संघटना आपल्या मुद्यावर ठाम आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. त्यामुळे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर येण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान राज्य सरकारला मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन देत आपापसात चर्चा करून ताबडतोब निर्णय कळवावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीन अजय कुमार गुजर सुनावणीसाठी गुरुवारी उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने समन्स काढले होते. त्यामुळे शुक्रवारी अजय कुमार गुजर यांनी न्यायालयात उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. न्यायालयाने आश्वासन दिलं असलं तरी संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सरकार समस्या सोडवत नाही, असा आरोप गुजर यांनी केला. सोमवारी पुन्हा सुनावणी घेऊन सरकारला समस्या सोडवण्याच्या सूचना देऊ, असे न्यायालयाने म्हटले आहे, परंतु कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. उलट हवं तर तुरुंगात टाका, असेही संघटनेकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.