एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. सरकारने हायकोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन करण्याबाबत जीआर काढला. आता हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये असेही त्यांनी म्हटले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी म्हटले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आली. विलिनीकरणाबाबत ही समिती 28 कामगार संघटनांशी चर्चा करून 12 आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. कोर्टाचे अंतरिम आदेश अद्याप मिळाले नाहीत. कोर्टाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये अन्यथा कारवाई करावी लागेल असेही परब यांनी म्हटले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. विलिनीकरण वगळता इतर जवळपास सर्वच मागण्या एसटी महामंडळाने मान्य केल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची प्रक्रिया एक-दोन दिवसांत होणारी नाही. त्यासाठी वेळ लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी लोकांना वेठीस न धरण्याचे आवाहनदेखील अनिल परब यांनी केले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.