मुंबई : भारतीय जनता पक्षाने आपल्या मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्या असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या १९ ऑगस्टला सुरू होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या जन आशीर्वाद यात्रांवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीकास्त्र सोडले आहे. भाजपने जरी महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी देखील राज्यातून शिवसेनेला कोणीही संपवू शकणार नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे.
भाजपच्या मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातून ४० नेत्यांना जरी मंत्रिपदे दिली तरी ते शिवसेनेला कदापि संपवू शकत नाहीत. जन आशीर्वाद यात्रा कशी सुरू झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बीडमध्ये पाहिलेच आहे, असे सामंत म्हणाले. एका वृत्तवाहिनीने सर्वेक्षणानंतर जाहीर केलेल्या देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॉप फाईव्हमध्ये स्थान देण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सामंत म्हणाले की, विरोधकांनी अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि सध्या ते ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व करत आहेत, त्यावरून त्यांनी देशाचेही नेतृत्व करावे हाच कौल या सर्व्हेतून आला आहे. यावेळी सामंत यांनी करोना संसर्गाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. राज्यात अजूनही करोना संपलेला नसून सर्वांनी करोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेले नियम पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनीही हीच भूमिका जाहीर केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हीच भूमिका आहे असे सामंत म्हणाले. जर कोणी अतिरेक करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रशासनाला त्याचे काम करावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही सामंत यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिला.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.